सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

पुस्तकं वाचणारी माणसे

 

Dear J,

आजच्या पोस्टाने तुझे पार्सल मिळाले. शेजारच्या पोस्ट ऑफिसला दोन तीनदा चौकशी केलेली न राहवून. गहाळ होण्याच्या भीतीनेच अंगावर काटा आलेला. 'मिळेल हो, कुठं जातंय, आलं नाही अजून इथं' अशी सारखी आश्वासक उत्तरं  तामिळमधून मिळत होती . शेवटी एकदाचे सुखरूप मिळाले. ते मी आज नीट ड्रॉवरमधे ठेवले. लंचब्रेकला डिपार्टमेंटचे सगळे कॅन्टीनला गेल्यावर हळूच ते उघडले. पुस्तकावर तू प्लास्टीकचं कव्हर लावून पाठवलंस ते बरं केलंस, इथे गेले आठवडाभर पावसाची रीप रीप चालूच आहे. 

संध्याकाळी घरी आल्यावर  हार्डबॉउंड कव्हरवर हात फिरवत मी खूप वेळ बसलो. पुस्तकाच्या मूळ मालकाने त्यात काही ठिकाणी समासांत पेंसिलने नोंदी केल्यात. title page च्या बाजूच्या पानावर 'Lt Col Atul Sinha' लिहिलंय वळणदार अक्षरात. आणि तारीख ३ ऑगस्ट १९७७. म्हणजे ३० वर्षांनी हे पुस्तक माझ्या हाती लागलंय. त्याआधी पाच वर्षांपूर्वी ते पब्लीश झालंय. ३५ वर्षांचं वयोमान. बांधणी अजून घट्ट आहे. नीट काळजी घेतलीय पुस्तकाची. 

कोण असतील हे कर्नल अतुल सिन्हा? का त्यांनी हे पुस्तक रद्दीत दिलं असेल? त्यांच्या समासातल्या नोंदी खूप विस्तृत आहेत. फिलॉसॉफीचे जबरदस्त रेफरन्स आहेत. त्यांचं पर्सनल कलेक्शन तर ग्रेटच असेल. लिन युतांगचा हवाला देऊन त्यांनी एके ठिकाणी अमेरिकन आणि चिनी माणसे वेळ कसा मोजतात ते लिहिलंय. अमेरिकन माणसे तीन महिने पुढचा विचार करून आयुष्य आखतात, उदा. अमुक एके दिवशी मी अमुक एका ठिकाणी अमुक एक करेन. टायपोग्राफिकल चुका अमेरिकन संपादक फार गंभीरपणे घेतात तर या उलट चिनी संपादक त्या चुका शोधल्यावर वाचकांना मिळणाऱ्या आनंदावर विरजण पडू देऊ इच्छित नाहीत. कधी कधी तर आपण एक कादंबरी क्रमशः छापतोय हेही ते विसरतात.  यापैकी आताच्या धकाधकीच्या आयुष्यात किती टिकलं असेल माहित नाही. 

पुस्तकासोबत बिल पाठवलं नाहीस. कळव. 

Yours,

S. 

२५/७/२००७

चेन्नई 

PS: या कर्नल अतुल सिन्हांबद्दल काही कळालं तर सांग. त्यांच्या कलेक्शनमधली काही पुस्तके असतील तर मला यादी पाठव. 


***

Dear J,

सोबत चेक पाठवत आहे. कर्नल अतुल सिन्हांच्या संग्रहातील मला हवी असेलेली पुस्तके तू पाठवलेल्या यादीत हायलाईट करून पाठवतोय. त्यांच्या मुलीशी तुझी भेट झाली हे मस्तंय. तुझ्यासारखा शेरलॉक तूच. युनिव्हर्सिटीच्या  कामासाठी पुढचे दोन आठवडे  तुतिकोरिनला असेन.  आल्यावर तुला कळवीन. तोपर्यंत ही पुस्तके शोध. 

Yours,

S. 

२०/८/२००७
चेन्नई

***

Dear J,

इथला मुक्काम अजून लांबला. महिनाभर इथेच आहे. अजून काही आठवडे इथेच असेन. इथल्या गेस्ट हाऊसचा पत्ता पाठवतोय. वाचायला आणलेली पुस्तके संपली. शहर छोटंसं आहे आणि पुस्तकांचं मार्केट जवळपास नाहीय. काही घबाड सापडलं तर कळव.  दुर्गा भागवतांचे 'वॉल्डेनकाठी विचार विहार' मिळेल का? सरूला हवंय. मी मुंबई मराठीला वाचलं त्याला काळ लोटला. त्याची झेरॉक्स करणार होतो संग्रहासाठी,  पण मन धजेना. बघ मिळतंय का?

Yours,

S. 

२७/९/२००७
तुतिकोरिन

***


Dear J,

गेस्ट हाऊसवर तू पाठवलेलं सेम्पेचं Monsieur Lambert मिळालं. फ्रेंच शिकतानाचे युनिव्हर्सिटीतले दिवस आठवले. तो हिरवा कॅम्पस, संध्याकाळी सातला अंधार भरून येत असताना हॉस्टेल ते लायब्ररी फेऱ्या आणि लाइब्ररीतील जुनाट पुस्तकांचा वास. 
लाइब्ररीच्या इमारतीबाहेर पिवळा बल्ब. 
कुणीतरी एखाद दुसरा विद्यार्थी असायचा त्या वेळी. MA मराठी करणारा एकनाथ आठवतोय तुला? आणि त्याने डब्यात आणलेली अतिविशाल बाजरीची भाकरी? लाइब्ररीत खाण्याला मनाई होती म्हणून समोरच्या बागेत बसून पोटाला आधार म्हणून कोरडी भाकरी चघळत आम्ही बसलेलो असू. मध्यंतरी ऐकण्यात आले कि लातूरला त्याने टूव्हिलर गाड्यांचे शोरूम काढले. 

कर्नल अतुल सिन्हांच्या संग्रहातील पुस्तकांचे काय झाले? पाठवणार असशील तर चेन्नईच्या पत्त्यावर पाठव. उद्या इथला मुक्काम हलवतोय. 

Yours,

S. 

९/१०/२००७
तुतिकोरिन

***

Dear J,

तीन किलोचं रजिस्टर पार्सल मिळालं आज. कृष्णमूर्ती म्हणून माझा कलीग आहे त्याला ह्या माझ्या पुस्तक संग्रहाचं फार नवल वाटतं. कर्नल साहेबांनी पुस्तके फार मेहनतीने जमवलेली दिसतात. देशोदेशीच्या भ्रमंतीचे ठसे आहेत. एक पुस्तक तर ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या लाइब्ररीने वीड आऊट केलेलं. एकावर व्हिएन्ना मध्ये विकत घेतलेला दुकानाचा शिक्का. पुढचे काही दिवस मस्त जातील. नवीन मोबाईल फोन घेण्याचा विचार आहे  CDMA. तुला नंबर कळवीन. 

 तू बिल पाठवायला हयगय का करतोस? पैसे नकोयत का?


Yours,

S. 

१२/११/२००७

PS: कर्नल साहेबांविषयी उत्सुकता आहे. येत्या पात्रात बिलासोबत त्यांच्याविषयी लिही. 

चेन्नई 

***

Dear J,

महिनाभराने तुझं पत्र आलं. कर्नल साहेबांनी कसं भरभरून आयुष्य जगलं आणि त्यांच्या पराक्रमाचे किस्से तू लिहिलेल्या पत्रातून वाचले. गेल्यावर्षी ते वारले हे वाचून खूप वाईट वाटलं. तू पाठवलेल्या एका पुस्तकात त्यांचा आणि त्यांच्या बायकोचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सापडला मला.  त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या संग्रहातील पुस्तकांचे सोयरसुतक नसल्याचे वाचून तर अजून वाईट वाटले.  मी इथल्या युनिव्हर्सिटीत काहीतरी खटपट करतो. त्यांचा पूर्ण संग्रह कितीला मिळेल याची चौकशी कर. 

बापरे एक भयानक विचार माझ्या डोक्यात वळवळू लागलाय. माझ्याही पश्चात माझ्या पुस्तकांना कसे दिवस येतील? 


Yours,

S. 

१२/१२/२००७

चेन्नई 



सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

प्रवासी

सांजवेळ झाली  तेव्हा प्रवासी अनोळखी गावाच्या वेशीजवळ पोचला. दूर त्याला घरांची छपरं आणि मिणमिणते दिवे दिसू लागले. एका मोठ्या वृक्षाच्या टोकावर पक्ष्यांचा गलबलाट चालू होता.  हातातल्या काठीने रस्ता चाचपडत तो गावाच्या दिशेने निघाला. पहाटे निघताना त्याने काहीबाही खाल्लेले. आता त्याचे पाणी झालेले. पाठीवरच्या पिशवीतून त्याने पावाचा उरलेला तुकडा काढला आणि हळूहळू चघळत त्याची पावले पडू लागली . त्याला असे वाटले आधीच्या मुक्कामाच्या गावातील माणसे खरेच देवमाणसे होती. ईश्वर त्यांना सदैव श्रीमंती बहाल करो. त्याला पडक्या देवालयातील कोपऱ्यात रात्र काढायला त्यांनी जुनी रजई दिली आणि पोटाला गरम जेवणही. त्या रजईशिवाय रात्रीच्या त्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत त्याचं काही खरं नव्हतं. 

सकाळ झाली तेव्हा त्या मोडक्या छपरातून आलेला प्रकाशाचा झोत आणि चमकणारे धुळीचे कण पहुडल्या पहुडल्या  बघत त्याने आपला भेगाभेगांचा तळहात त्या उजेडात धरला. ऊन अजून कोवळं होतं. त्याने प्रकाशाकडे पाहत डोळे मिटून घेतले आणि डोळ्यांच्या आतल्या बाजूच्या लालेलाल प्रकाशावर लक्ष केंद्रित केलं. अजब अजब आकार तार्यांसारखे चमकत त्या पडद्यावर दिसत होते. असंच ऊन खात पडून राहावं असं त्याला वाटलं. पिशवीतील पाण्याचा घोट घेऊन त्याने चूळ भरली. रजईची नीट घडी घालून पिशवीत ठेवली. आता निघायला हवे. जाताना त्याने काल भेटलेल्या वयोवृद्ध म्हाताऱ्याला अलविदा केलं. म्हाताऱ्याने एकही अक्षर न बोलता त्याला हात उंचावून सांभाळून जाण्याची सूचना केली.  वाटेतील झऱ्यात ढोपरापर्यंत उतरून त्याने चेहऱ्यावर पाण्याचा थबका मारला. थोडे पाणी जवळच्या चामडी पिशवीत भरून घेतले.  

उन्ह माथ्यावर आली तेव्हा बऱ्यापैकी सावलीची जागा पकडून त्याने अंग टेकलं. पिशवीतून पुस्तक काढून तो वाचू लागला. त्या पिशवीत हे एकच पुस्तक होतं आणि तेही बऱ्याचदा पारायण करून झालेलं. जागोजागी खुणा करून झालेल्या. प्रवासात एका बाजाराच्या गावी त्याला पुस्तक विक्रेत्याने हे विकलं होतं. चामडी बांधणीचं नक्षीदार. त्याला वाचायची इतकी सवय नव्हती तरी त्याने निश्चयाने ते पूर्ण केलं. आता ते वाचताना गरम हवेची एक झुळूक त्याच्या चेहऱ्यावरून गेली आणि आलेल्या थकव्याने त्याला केव्हा झोप लागली त्यालाही कळले नाही.  स्वप्नात त्याला एका बाजाराच्या गावी खाल्लेल्या मिठाईची आठवण झाली. जिभेवर ठेवताच विरघळून जाणारी ती जांभळी मिठाई, तलम रेशीमचे कपडे नेसलेली ती स्त्री आणि ग्राहकांच्या घासाघाशीच्या त्या गदारोळात त्या स्त्रीच्या डोळ्यांत डुबत चाललेलो आपण. दूर कुठूनतरी येत असलेला वाद्यांचा मंजुळ ध्वनी, आणि पावले ओढत नेतील ती वाट. झाडावरील एक छोटं फळ त्याच्या चेहऱ्यावर पडलं आणि त्याला जाग आली. रात्र होईतो दुसऱ्या गावी मुक्कामासाठी पोचायला हवं असा निश्चय करत त्याने स्वतःला सावरलं आणि पावलं झपाझप पडू लागली. अनेक छोटे झरे पार करत तो डोंगरावरून उतरू लागला. काही मैल पार केल्यावर त्याला दूरवर वस्तीची खूण दिसली. ईश्वरा,याही गावातील माणसे भली निघोत. प्रवाशाचे मन कामना करू लागलं. 



शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१

आभासी प्रतिमांच्या जगात

         घड्याळात पहाटे साडेचारचा गजर झाला. सुमेधने  त्रासिक चेहरा करून पांघरून दूर केलं. त्याने पलंगावरून उतरून गालिच्यावर पाय ठेवताच घरातील दिवे लागले, कॉफीची मशीन चालू झाली. घरातील मोठ्या भिंतीवजा स्क्रीनवर ट्रॅफिकचे अपडेट्स व दिवसाचं सगळं वेळापत्रक  आलं. त्याने हाताने स्क्रोल करून महत्वाच्या गोष्टी टिपून घेतल्या. तेवढ्यात त्याचा पर्सनल रोबो त्याच्याजवळ येऊन उभा राहिला. त्याने टूथब्रश व नॅपकिन सुमेधला दिला. सुमेध अंघोळ करेपर्यंत टेबलवर नाश्ता तयार होता. पांघरुणाची घडी व्यवस्थित घालून बेडरूम नीट आवरली गेली होती. नाश्ता करताना त्याला प्रोफेसर मार्टिन यांची आठवण आली. आज त्यांना कुठल्याही परिस्थितीत भेटून कन्विन्स केलंच पाहिजे. जेवताना त्याने मोबाइलवर कालचे शरीराचे मेट्रिक्स पाहिले. या महिन्याचा ऑक्सिजनचा किती कोटा उरलाय याची त्याने नोंद केली. या महिन्याच्या उरलेल्या दहा दिवसांसाठी तेवढा ऑक्सिजन पुरेसा होता. पुढच्या एक तारखेला पुन्हा सरकारकडून त्याच्या अकाउंटला ठराविक ऑक्सिजन जमा होणार होता. त्याच्या नाकपुड्यांना जोडलेल्या यंत्रांनी त्याचे मापन केले जायचे व त्याचे सर्व तपशील सरकारदरबारी जमा होत. 

        सन २५०० उजाडलं तेव्हा कित्येक दशकं चाललेली मानवाधिकार आंदोलनं मोडीत काढून सरकारने ऑक्सिजनची वितरण व्यवस्था स्वतःकडे घेतली होती. ऑक्सिजन ही सगळ्यात दुर्लभ कमोडिटी बनल्यामुळे भ्रष्ट्राचाराला आळा घालण्यासाठी नवीन कायदे आणले होते. काही शतकांपूर्वी जसे अन्नधान्य रेशनकार्डवर मिळे, तसे आता ऑक्सिजन बाबत घडू लागले. बेछूट वृक्षतोडीमुळे आणि शतकभर चाललेल्या दुष्काळामुळे जगभर वनसंपत्ती नामशेष होण्याच्या मार्गावर होती. क्वचित कुठला पक्षी आकाशात उडताना दिसे. आणि तो दिसल्यावर मोठी माणसे लहान मुलांना कडेवर घेऊन दाखवीत. हवेत विषारी वायूचे प्रमाण जास्त असल्याने प्रत्येक कार्यालय आणि घरात हवा शुद्ध करण्याची यंत्रे बसवलेली असत. सरकारने कडा विरोध पत्करून नागरिकांचे जीवनमान साठ वर्ष ठरवले होते. 

        वयाची साठी गाठायच्या सहा महिन्यांपूर्वी नागरिकाला नोटीस येई. अमुक तारखेनंतर ऑक्सिजन मिळणार नाही आणि देहदान करायच्या ठिकाणी जमले पाहिजे असा आदेश असे. पळून जाण्याचा प्रश्नच नव्हता. जगाच्या कुठल्याही भागात गेलात तरी सरकारच्या सेंट्रल डाटाबेसमध्ये जीपीएसची नोंद होई. आयुष्यभर तुम्ही कुठे फिरलात, अमुक एका वेळी कुठे होतात ह्याचा लेखाजोखा क्षणात मिळे. डीएनए सिक्वेन्समुळे अफरातफर करायचा प्रश्नच न्हवता. शेवटच्या दिवशी नागरिकाला विदा करायला त्याचे कुटुंबीय येत.  दहा फुटबॉल स्टेडियम भरतील अशा विशाल इमारतीत देहदानाची प्रक्रिया चाले. सुमेध याच इमारतीत कामाला होता. मरणपंथावरच्या या नागरिकांच्या स्मृती जतन करायच्या विभागात तो सिनियर मॅनेजर या हुद्द्याला होता. 

      मृत्यू बाबतची अनपेक्षता सरकारने कायदा करून नष्ट केल्याने सगळीकडे असंतोष माजेल, कायदा सुव्यवस्था राहणार नाही याची सरकारला भीती वाटत होती. माणूस आपण कधीच मरणार नाही या अविर्भावात जगत आला होता. जवळच्या व्यक्तीचे जाणे काही काळाने मृत्यूचे शाश्वत सत्य बोथट करे. आता मृत्यूची तारिख ठरल्यावर माणूस कसा रिऍक्ट होईल यावर विद्यापीठांत संशोधन झाले, खूपसे शोधनिबंध प्रसिद्ध झाले. प्रगत तंत्रज्ञानाने जर माणसाच्या स्मृती जतन करता आल्या तर सरकारच्या निर्णयाला थोडा तरी पाठिंबा मिळेल असा दावा शास्त्रज्ञांनी केला. मग यासाठी वेगळा विभाग सुरु करण्यात आला. अत्याधुनिक संगणकीय  तंत्रज्ञानाने माणसाची हुबेहूब आभासी प्रतिमा सतत त्याच्या नातलगांसोबत राहील, आधीच रेकॉर्ड केलेले हावभाव, वाक्ये, वेगवेगळे पेहराव यामुळे ती प्रतिमा जिवंत वाटे.  त्या प्रतिमेतून आरपारचे दिसे, पण प्रतिमेला अजून कसे परिणामकारक करता येईल यावर संगणक तज्ञांच्या कॉन्फरेन्स होत. 

        सुमेधला प्रोफेसर मार्टिन यांना भेटायचं होतं ते याच कारणासाठी. या प्रकल्पासाठी त्यांची निवड केली गेली होती. प्रोफेसर मार्टिन युनिव्हर्सिटीत इतिहास शिकवत. 'बाविसाव्या शतकातील मूल्यभान'  हा त्यांच्या पीएचडीचा विषय होता. अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक, जबाबदार पालक ते प्रेमळ आजोबा असा त्यांचा प्रवास राहिला होता. काही महिन्यांत त्यांचा साठावा वाढदिवस होता. स्मृतिजतन करण्याच्या प्रकल्पात त्यांचे फोटो, मुलाखती, चालण्याच्या, हावभावाच्या इत्यादी लकबी संगणकाने प्रोसेस करून त्यांची आभासी प्रतिमा तयार केली होती. ती पाहताना क्षणभर त्यांनादेखील गहिवरून आलं. जेव्हा ती प्रतिमा आणि ते जोडीने उभे राहिले तेव्हा त्यांना अश्रू आवरणे कठिण झाले. त्यांच्या कुटुंबियांना या प्रकल्पाची कल्पना नव्हती. हा प्रोटोटाईप त्यांच्या कुटुंबियांना दाखवून त्यात त्यांनी बदल सुचवावेत असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी ठाम नकार दिला.  त्यांच्या जाण्याला अजून काही महिने शिल्लक असताना आताच त्यांची उणीव जाणवून देणे त्यांना पटत नव्हते. त्यांची पत्नी, मुले, नातवंडे कशी रिऍक्ट होईल याची त्यांना काळजी वाटत होती. सुमेधने त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. प्रोफेसर मार्टिन यांच्या जाण्यानंतर त्यांच्या प्रतिमेत काहीच बदल करता येणार नाही, याउलट त्यांच्या कुटुंबियांच्या भावना जाणून घेतल्यावर या प्रतिमेत, डाटाबेसमध्ये आवश्यकसे बदल करता येतील असे त्याने सहानुभूतीपूर्वक सांगितले. शेवटी प्रोफेसर मार्टिन तयार झाले पण त्यांची एक अट होती, ही सर्व चाचणी प्रयोगशाळेत न करता त्यांच्या घरी केली जावी आणि ते उपस्थित नसताना.  ही अट मान्य केली गेली. ही सर्व चाचणी नियमानुसार चित्रित केली जाणार होती. 

        चाचणीच्या दिवशी सरकारी अधिकारी, तंत्रज्ञ, प्रोफेसर मार्टिन यांच्या घरी आले.  पूर्वसूचना दिल्यामुळे सर्व कुटुंबीय घरी होतेच. सोबतच्या चौकोनी ठोकळ्यासदृश यंत्राला त्यांनी घरातील नेटवर्कला जोडलं आणि स्वीच ऑन केला. प्रोफेसर मार्टिन यांची आभासी प्रतिमा घरात वावरू लागली. त्यांच्या  दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे डाईनिंग टेबलवर हसत चहा पिताना, सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करताना, दुपारी सोफ्यावर पुस्तक वाचत पेंगताना असे रेकॉर्ड केलेली दृश्ये दाखवली जाऊ लागली. सुरुवातीला भावनिक झालेले सगळे कुटुंबीय हळूहळू या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करू लागले. छोट्याशा इकिरुला तर आजोबांची प्रतिमा पाहून गंमत वाटत होती. तिला जन्म मृत्यू या सर्वांचा गंधच नव्हता. तिचं नाव आजोबांनी ठेवलं होतं. विसाव्या शतकातील जपानी भाषेतील हा शब्द होता ज्याचा अर्थ 'जगणे' असा होता.  

        प्रयोगशाळेतून प्रोफेसर मार्टिन हे सगळे पाहत होते. संध्याकाळी इकिरुला झोपण्यापूर्वी गोष्ट सांगण्याचा कार्यक्रम असे. त्यांनी खास तिच्यासाठी वर्ष-दोन वर्ष पुरतील एवढ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या होत्या. त्यासाठी त्यांनी ग्रंथालयातून प्राचीन ग्रंथ जमा केले होते. आज त्यांची प्रतिमा इकिरुला गोष्ट सांगत होती.  मोठं कथानक असलेल्या शूर राजा आणि त्याच्या साहसांबद्दल ही गोष्ट होती. गोष्ट ऐकता ऐकता  इकिरु झोपी गेली. सवयीप्रमाणे प्रोफेसर मार्टिन यांची प्रतिमा झोपण्यापूर्वी पुस्तक वाचताना दाखवली जात होती. त्यांच्या हातात त्यांचं अत्यंत आवडतं झेनकथांच पुस्तक होतं. त्याच्या एका पानावर पुढील कथा होती:

"A Japanese warrior was captured by his enemies and thrown into prison.That night he was unable to sleep because he feared that the next day he would be interrogated, tortured, and executed. Then the words of his Zen master came to him, "Tomorrow is not real. It is an illusion. The only reality is now." Heeding these words, the warrior became peaceful and fell asleep."

        प्रोफेसर मार्टिन हे सगळं प्रयोगशाळेतून पाहत होते. त्यांनी प्रयोगशाळेत सगळ्यांना गुड नाईट विश केलं आणि घराकडे निघाले. निघताना त्यांनी एक दीर्घ श्वास घेतल्याची त्यांच्या ऑक्सिजन मापन यंत्राने नोंद केली. 

***

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१

लग्नसमारंभ

            मी आठ वर्षाचा असताना मामाच्या लग्नाला गेलो होतो. आयुष्यात अटेंड केलेलं पहिलं लग्न. ते चांगलंच लक्षात आहे ते दोन कारणांमुळे. एक : मी पोलिसाचा ड्रेस घातला होता (टोपी सकट) आणि दुसरं कारण म्हणजे लग्नाला जाताना वऱ्हाडाच्या टेम्पोत मला  उलट्या झाल्या होत्या.  मे महिन्यातली दुपारची ती रखरखती दुपार, घाटाची वळणे, टेम्पोचा डिझेलचा उग्र वास आणि आंबूस झालेलं तोंड यामुळे तो दिवस कायमचा कोरला गेलाय माझ्या आठवणींत. मामीच्या माहेरी परत कधीही  जाताना या घटनेची परत उजळणी होतेच. पोलिसाचा ड्रेस शिट्टीसकट घ्यायचा मी का हट्ट केला असेल याचा मला आता अर्थबोध होत नाही. मी लहानपणीदेखील आताइतकाच समंजस होतो असा माझा समज आहे, सतत चेहऱ्यावर गंभीर भाव असायचे. त्यामुळे आई-वडीलांनीच त्यांच्या मनासारखं करत मला तो ड्रेस घालायला भाग पाडलं असेल. त्या लग्नाचे फोटो पाहताना मला विलक्षण अवघडल्यासारखं होतं.  फोटोत माझा छोटा भाऊ मात्र मस्त चौकड्यांचं शर्ट आणि हाफ चड्डीत आहे आणि मी - मामा-मामी शेजारी लाच घेतल्यावर पकडल्या गेलेल्या पोलिसासारखा उभा आहे. 

            गावाकडच्या  लग्नांत आता बुफे पद्धत आलीय. मात्र अजूनही काही ठिकाणी जेवणाच्या पंगती उठतात. लग्नाचे जेवण पुरुष मंडळी बनवतात. त्यासाठी चरव खंदला जातो. मोठमोठी पातेली, त्यात रटरटणारा भात, लाल पिवळसर किंचित हिरव्या बुंदीने भरलेली घमेली,  आणि वांगी आणि बटाटाच्या मोठ्या फोडी असलेली तीच फेमस भाजी. ही वांगी-बटाटयाची साधी रस्सा भाजी मिशलिन स्टार रेस्तराँत पण मिळणार नाही. त्या चवीने नॉस्टॅल्जिक होऊन मी घरी कित्येकदा तशी भाजी बनवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. लाकडाचा  स्मोकिनेस, धूळमाती , क्लोरीन नसलेलं झऱ्याचं शुद्ध पाणी आणि हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं, कुणीही जेवणाला नाव ठेवून अतृप्त जाऊ नये यासाठी झटणारी भावकीतली माणसे ही महत्वाची इन्ग्रेडिएंट्स असल्याशिवाय त्या बिनमिठाच्या भाताला आणि रस्सा भाजीला चव कशी येईल? त्या सोहळ्यात गोणपाट अंथरून त्यावर वांगी चिरत, लसूण सोलत आजूबाजूच्या कोलाहलाचा भाग होताना मजा असते.  पंगतीत जेवताना श्लोक म्हटले जात. श्यामची आई पुस्तकात याचा उल्लेख आहे. माझ्या पाहण्यात तशा श्लोक म्हणण्याच्या स्पर्धा पंगतीत घडल्या नाहीत. जेवण वाढताना नजरानजर होऊन काही लग्न जुळल्याची उदाहरणं मात्र लक्षात आहेत. 

        लग्नानंतरच्या वराती पाहण्यासारख्या. बैलगाडीला मस्त डेकोरेट करून वाजंत्रीने मिरवत, ढोल खेळत वराती निघत.  आता सगळीकडे वरातीची स्पेसिफिक गाडी असते त्या पुढे डीजे असतो आणि बेधुंद नाचणारी मुलं मुली. मराठी मुक्तछंदातली कविता कितीही आशयघन असली तरी इथे कामाची नाही. इथे पाहिजे ते हे. 

 "गढुळाचं पाणी कशाला ढवळीलं..  नागाच्या पिलाला तू का ग खवळीलं? 

"अहो  मामी. .  तुमची मुलगी लय सुंदर. "

माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले दोन मित्र (त्यांना सोयीसाठी आणि गोपनीयतेसाठी  रमेश आणि सुरेश म्हणूया ) आजूबाजूच्या गावांतील वरातीत नाचायला जात. सूत जमवणे हा मुख्य उद्देश असायचा. अजूनही वरातीत छान नाचणाऱ्यांना बक्षीस मिळते काही ठिकाणी. तर सांगायची गोष्ट अशी कि रमेश आणि सुरेश दुसऱ्या गावी जायचे. सुरेश नाचत असताना रमेश माईकवाल्याजवळ जाऊन सुरेशसाठी पाचशे रुपये बक्षिसाचा पुकारा करायचा, मग सगळ्यांचे लक्ष त्याकडे वेधले जायचे. हीच ट्रिक सुरेश त्याच्या मित्रासाठी दुसऱ्या गावात करायचा. अशा रीतीने महिलावर्गाचे लक्ष आकर्षून घेण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला असे. 

        शहरात हॉलमध्ये लग्न असल्यावर मी शक्यतो जायचं टाळतो . दुपारच्या उकडत्या वातावरणात कोंबून भरलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या, भिंतीला लावलेल्या पंख्याची हवा खाण्यासाठी धडपड करणारी माणसे, स्टेजवर चाललेले अनाकलनीय विधी आणि मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोकं घालून बसलेली माणसे. सगळीकडे हाच देखावा. जेवणात पनीरची भाजी, सोडा टाकलेला जिरा राइस, दाल तडका, गुलाबजाम आणि आईस्क्रीमची रांग.  एकदा वाशीला सेक्टर शोधत शोधत लग्नाच्या हॉलजवळ आलो तेव्हा पोचायला उशीर झाल्याने लग्न काही गाठता आले नाही.  जेवल्यावर कळलं कि लग्न तर पहिल्या मजल्यावर आहे. तिथे तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर दोन्ही ठिकाणी लग्नें होती. 

        Pre Wedding फोटोशूट साठी हल्ली छोटे छोटे द्वीपसमूह शोधले जातात. सिनेमाच्या धर्तीवर लग्नाची शॉर्टफिल्म बनवली जाते. लग्न आयुष्यात एकदा होत असल्याने सगळ्या हौशी भागवल्या जातात. 

        ताईचं लग्न होतं त्या दिवशी. सकाळी वऱ्हाड घेऊन बस जाण्याआधी आम्ही घराशेजारच्या देवळात गेलो. ताईने माझा हात घट्ट धरून ठेवला होता. त्या थरथरत्या स्पर्शात तिला जाणवणारी anxiety मिश्र भीती मला कोण जाणे त्या वयात कळली नव्हती. काही वर्षांनी माझ्या लग्नात मला तो प्रसंग आठवला आणि त्या भावनेची खूण पटली. 


 

रविवार, १० जानेवारी, २०२१

मुग्धा स्वप्न बघते

 काल बाबांचा मला खूप खूप राग आलेला. माझं आवडतं चॉकलेट त्यांनी ऑफिसवरून येताना आणलं नाही. मोठ्यांना कसं कळत नाही छोट्या मुलांचे कसे लाड करावेत. त्यात त्यांनी आल्या आल्या टीव्हीपण बंद केला. मला खूप खूप राग आला. मग मी बाहेर फिरायला गेले. मला कुठे जायचंय माहित नव्हतं. वाटेत मला खूप मोठी नदी दिसली. बघते तर काय नदीचं पाणी अगदी सफेद दुधासारखं. पण मला दूध प्यायला आवडत नाही. मी दूध नाही पिलं तर आई डोळे मोठे करते. मग मी माऊसारखं गुपचूप दूध पिते. 

तर त्या नदीच्या आजूबाजूला मोठे पर्वत होते. पर्वत माहितेय का कशाचे ? आईसक्रीमचे. किती थंडगार वाटत होतं. फ्रीजचा दरवाजा उघडल्यावर वाटतं तसं. मी थोडं आईसक्रीम खाल्लं आणि थोडं आईसाठी घेतलं. आई रागावते पण ती खाऊ पण देते. 

पुढे मला छोटा भीम दिसला. त्याने मला विचारलं, " मुग्धा, कुठे चाललीस ?". मी म्हटलं. मी चाललीय भुर्रर्र. चॉकलेटच्या देशात. जिथे खूप चॉकलेट आणि कॅडबरी आणि कुरकुरे असतील. तो म्हणाला "मी पण येतो मग". मी म्हटलं "बघ बाबा तू. माझ्याकडे तुझ्या तिकिटाचे पैसे नाहीत" तो म्हणाला "तिकीट नाही लागत इथे. बघ माझ्याकडे किती लाडू आहेत मोतीचूरचे खूप दिवस पुरतील आपल्याला. हे घे एक" मग मी त्याला थोडं आईसक्रीम दिलं आणि लाडू खायला लागले. खाताना बोलू नये असं आजी म्हणते म्हणून आम्ही थोडा वेळ न बोलता खाऊन घेतलं. 

आम्ही पुढे चालू लागलो. मग जंगल लागलं. मला थोडी भीती वाटली पण छोटा भीम म्हणाला, "घाबरू नको मी आहे. वाघ सिंह आला तर एकच फाईट मारेन!" तेवढ्यात सिंहाची डरकाळी ऐकू आली. मी घाबरून मागे बघितलं तर छोटा भीम गायब. मग मी खूप घाबरले. मला रडू आलं. आईची आठवण आली. तेवढ्यात कुणीतरी मला हलवून जागं केलं बाबांनी माझा पापा घेतला आणि म्हणाले, "रागावली का माझी सोनू बाळ ! हे घे चॉकलेट आणि अभ्यास करा जरा. सहामाही परिक्षा आहे ना. छोटा भीम कमी बघा परीक्षा होईपर्यंत. 

मी आईकडे बघितलं.  ती हसली फक्त. जेवल्यावर तिने फ्रीजमधून आईसक्रीम काढलं. स्वप्नातील आईसक्रीमपेक्षा तिच्या हातचं  आईसक्रीम खूप टेस्टी होतं. 

शनिवार, २ जानेवारी, २०२१

किडलेली माणसे

गंगाधर गाडगीळांची 'किडलेली माणसे ' नावाची कथा आहे. समाज म्हणून आपण किती mediocre आहोत हे अधोरेखित करणारी कथा. काही गुंड एक दुकान फोडून त्यातील सामान लंपास करीत असताना बघ्यांची गर्दी जमते. त्या गुंडांना थांबवण्याऐवजी शेजारच्या चाळीतील लोक निष्क्रियपणे पाहत राहतात. त्यातील काही त्या लुटीत सामील होतात. 

अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी प्रत्यक्षात घटली. मध्य प्रदेशात कोंबड्या वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात झाला. त्या अपघातातील चालकाला मदत करण्याऐवजी शेजारच्या गावकऱ्यांनी कोंबड्या पळवून न्यायला सुरवात केली. एका वेळी चार पाच कोंबड्या काखोटीला मारून गावकऱ्यांनी पोबारा केला. या सर्व घटनेचा विडिओ या लिंक वर  आहे .  

काही देशांत वर्तनमानपत्र विक्रीच्या स्टॉलवर देखरेख करायला कुणी नसतं. आपल्याला हवं ते वर्तमानपत्र किंवा मासिक घ्यायचं आणि अचूक पैसे तिथे ठेवायचे किंवा सुट्टे पैसे परत घायचे हा शिरस्ता असतो. समाज म्हणून तुमच्या प्रामाणिकपणावर विश्वास असतो. लहानाचं मोठं होत असताना काय चूक काय बरोबर (ethics) शिकवलं जातं. 

पालिकेने बस स्टॉपवर लावलेल्या स्टीलच्या प्लेटस, दिवे लगोलग गायब करणारी माणसे, रोज कचऱ्याची गाडी येत असताना रस्त्यावर कचरा टाकणारी माणसे, पचापचा थुंकून सार्वजनिक ठिकाणी रंगरंगोटी करणारी माणसे,  फुले तोडू नयेत असा बोर्ड लावलेला असला तरी बागेतील फुले तोडून पूजेसाठी नेणारी माणसे अशी यादी पुढे extrapolate करत भ्रष्ट अधिकारी व नेत्यांपर्यंत नेता येऊ शकते. 

काय करता येईल आपल्याला प्रामाणिकपणाचं बीज रोवण्यासाठी? 

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

गोष्ट

तारलई गावाच्या वेशीवर मंडपवाल्या केश्याचं घर आहे. गावापासून तसं घर दूरच. आजूबाजूला जेमतेम दोन तीन घरं. पण ती रिकामीच.  त्या घरातली माणसे मुंबई पुण्याला राहायला. जत्रेला दहा पंधरा दिवसांसाठी कुठे ती घरे माणसांनी भरून जायची. बाकी वर्षभर निरव शांतता असायची आसपास.  गावातल्या बायका केश्याच्या बायकोला रंजनाला विचारायचे कि कसे राहता इतक्या लांब? माणसाची चाहूल नाय आजूबाजूला. रात्री जरा खुट्ट झालं तरी आमचा जीव वरखाली होतो, तुम्ही राहता कसे बिनघोर? रंजी म्हणायची कि आत्याबाय हायता, गुरं हायती मग कशाला घाबरायचं. केश्याचे बरेच उद्योग असायचे. मंडपासोबत त्याने लाऊड स्पीकर भाड्याने द्यायला सुरुवात केली, मग लोकांना ने आणायला जीप घेतली. हे सारे उद्योग सण समारंभासाठी पूरक होते. पण यासर्वांमुळे त्याला घरी यायला नेहमी उशीर व्हायचा . कुठे सप्ताह, दिंडी वगैरे असली कि दोन तीन दिवस घरी फिरकणं नसायचं. केश्याची आई भीमाक्का वयाने थकलेली, पण अगदी काटक बाई. सकाळपासून कामात असायची. सकाळी न्याहारी झाली कि सून गुरांना घेऊन रानात जायची. म्हातारी भीमाक्का घर सांभाळायची. घराच्या आजूबाजूला फिरून हिरवाट आणायची. गुरांचा गोठा झाडलोट करायची. केश्याला आणि रंजनाला मुलबाळ नव्हतं.  केश्या घरी नसला तरी सासू सून गुण्यागोविंदाने राहायची. घरात नवीन टीव्ही घेतल्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत तो चालू असायचा.

पाली जत्रा जवळ आली होती. केश्या जीप घेऊन दोन दिवसांसाठी पाली गावाला सकाळीच निघाला. सोबत गावातील पाच सहा जण सोबत होते. म्हातारीला व बायकोला सांगून गेला कि नीट ऱ्हावा. घरात फक्त त्याच्याकडेच मोबाईल होता. जर गरज पडली तर कदमांच्या घरी राजुला फोन करायला सांगावं लागायचं. दुपारपासून म्हातारीचं अंग भरून आलं. संध्याकाळी म्हातारी सुनेला म्हणाली मला जेवाया नगं, भूक न्हाय. तरी बळेबळेच रंजीने तिला भाकरी भाजी खायला लावली. साडे नऊ वाजले असतील, म्हातारी आतल्या खोलीत झोपायला निघून गेली.  रंजीने सगळं आवरलं. झाकपाक केलं. नेहमीच्या सिरीयल बघितल्या. झोपायच्या आधी म्हातारीला विचारू म्हणून आतल्या खोलीत गेली तर म्हातारीची काहीच हालचाल नाही. आत्याबाय, झोपलाव का? तर एक नाही दोन नाही. अंग गरम आहे का बघायला तिने तिच्या कपाळाला हात लावला तर अंग थंडच पडलेलं. हलवून बघितलं तर म्हातारी गारच. रंजी भेदरली. रात्रीचे साडे अकरा वाजलेले. गावात डॉक्टर नाही. शेजारी कुणी गडीमाणूस नाही. नवऱ्याला फोन करून सांगावा धाडावा तर फोन नाही. म्हातारीला बरेच प्रयत्न करून जाग आली नाही तेव्हा तिला कळलं कि म्हातारीने जीव सोडला. आता करावं काय? तिने तडक पायात चप्पल सरकवली, दरवाजाला कडी कुलूप लावलं आणि गावात गेली. चांदणं टिपूर पडलेलं होतं. कुणाला काय सांगायचं हेच तिला कळत नव्हतं. रडायला तर येत होतं पण भीती जास्त वाटत होती. पहिल्यांदाच इतक्या रात्रीची ती गावाकडे निघाली होती. जत्रेच्या वेळेला रात्रीचा तमाशा असायचा गावातल्या शाळेसमोरच्या मैदानात, पण तेव्हा रस्त्याने माणसे असायची सोबत. भीती वाटायची नाही.

गावातील कुत्री अचानक भुंकायला लागली . गावात कदमांच्या घरी रंजी गेली आणि दार ठोठावलं. त्यांच्याकडे मंडळी जागीच होती. शुक्रवारचा पिच्चर लागलेला दूरदर्शनवर. तिने गेल्यावर सांगितलं कि आत्याबाय काय उठंनात. राजू, शेजारचे मारुती आण्णा, शेखरआप्पा केश्याचा घरी निघाले. राजूने केश्याला फोन करून निघायला सांगितलं. मारुतीआण्णा  जवळ चार्जिंगची बॅटरी होती. डुक्कराच्या शिकारीला जाताना वापरत. केश्याच्या घरी सगळे पोचले. अंगणात पिवळा बल्ब पेटत होता. घराच्या आत गोठ्यात गाय हंबरत होती. रंजीने कुलुप उघडलं आणि दार ढकललं तेव्हा सर्वांनी जे पाहिलं त्यांने त्यांना कापरं भरलं. म्हातारीचं प्रेत उंबरठ्यापर्यंत येऊन पोचलं होतं. रंजीने जाताना आतल्या खोलीत म्हातारीला झोपलेलं बघितलं असताना ती आता वटी, गोठा पार करून उंबरठ्यापर्यंत कशी येईल? कुणी काहीच बोलेना. म्हातारीचा जीव गेलाय याची सगळ्यांनी पुन्हा एकदा खात्री केली.  राजुने फोन करून गावात वर्दी दिली आणि तयारीला लागायला सांगितलं. केश्या येईपर्यंत मढं जागवायला पाहिजे. म्हातारीला भिंतीला टेकवून बसवलं. नाकात कापूस घातला. माणसं जमू लागली. अंगणात खुर्च्या टाकून माणसे बसली.  बायका आतल्या खोलीत रडू लागल्या. पुरुष मंडळी  बाहेर बसून पुढचं काय करायचं यावर बोलत होती.
म्हातारीचं प्रेत आतल्या खोलीतून बाहेर आलं कसं दबक्या आवाजात विचारू लागली. कुणी म्हटलं- असेल थोडी धुगधुगी जीवात. कुणी म्हटलं रंजीने नीट बघितलंच नसेल,म्हातारी जिवंत असेल तेव्हा. कुणी म्हटलं जर कुलूप लावलंच नसतं तर?

रात्री अडीच तीनला सगळीकडे सामसूम होती. अंगणात माणसे पेंगत दबक्या आवाजात रात्र जागवत होते. घरात आतल्या खोलीत रंजीचे डोळे आणि गाल रडून रडून दुखत होते. चुलीवर सगळ्यांसाठी चहा कढत होता. बाहेरच्या खोलीत म्हातारीचं मढं देवळीजवळ भिंतीला टेकवून बसवलं होत. बाजूला उदबत्त्या लावल्या होत्या. म्हातारीच्या चेहऱ्यावर एक हलकीच स्मितरेषा उमटली.

***